Thursday, 28 July 2011

अन्यथा

तत्त्वज्ञान त्याचे विवेचन करील
पण कविता त्याचा शोध लावते
कारण
तो आणि आपण
यांच्यातील संबंध
नाही मीमांसेचा,
तो आहे फक्त
काव्याचा
आणि म्हणूनच
बेबलच्या सनातन मनोर्यामधे
जेव्हा नेतिअस्तीचे वादंग
मीमांसक माजवीत असतात,
तेव्हा
केवळ कवीसाठी
तो करतो स्वत:चा सारांश
इंद्रियसुंदर स्वरुपात
सृष्टीतून उतरतो खाली,
रहस्यदुर्गाच्या उग्र सावल्यांतून
पहारे चुकवीत बाहेर निसटणार्या
कलंदर राजपुत्रासारखा,
आणि
कवीच्या संवादी हातात घालून
रागदरीतील महत्तम स्वरासारखा
भ्रमण करतो
अस्तित्वाच्या सर्व हद्दीपर्यंत
अन्यथा
तुकारामांचा अभंग
संभवलाच नसता

- कुसुमाग्रज

No comments:

Post a Comment