Monday 22 July 2013

स्टेट

शासकांनी
खोबरेल तेलाचे न्याय वाटप व्हावे म्हणून
सेक्टर सेक्टरमध्ये केंद्रे काढली
दर दिवशी प्रत्येकाने आपले डोके पुढे करायचे
आणि टाळूवर तेल चोपडून घ्यायचे
प्रतिभावंताने
आपले डोके असे खोबरेल तेलासाठी वाकवायचे
म्हणून ठाम नकार दिला,
खंबीर भूमिका घेतली:
खोबरेल तेल ही स्वायत्त वस्तू असून
कलावंताला त्याच्या इच्छेप्रमाणे
कोणापुढेही न वाकता
डोक्यास तेल चोपडण्याचा
जन्मसिद्ध अधिकार आहे!

शासनही खंबीर होते, ठाम होते
त्याच्या दृष्टीने सामान्यांच्या हितासाठी
काही कटू निर्णय घ्यावेच लागतात
शेवटी प्रतिभावंताने देश सोडला,
सोडचिट्ठी दिली,
परकी नागरिकत्व स्वीकारले,
तेथे त्याने सुरुवातीला छळाच्या कहाण्या सांगितल्या

पापड मोडला म्हणून फाशी
भर रस्त्यात चिथावले म्हणून फाशी
कवितेचा कट केला म्हणून फाशी
आणखीन काय काय बांधवांच्या कणवेपोटी!
शेवटी त्यालाही लोक कंटाळले,
बेचव कहाण्यांना
त्यांना छळाच्या ताज्या कहाण्या हव्या होत्या
आणि तेही कंटाळला
स्वातंत्र्याला
मुक्ततेला
अनिर्बंधतेला
मातीला आपल्या हाडांची ओढ अटळ असते
हे त्यालाही आतून नाकारता आले नाही

आता त्याच्यापुढे
गहन प्रश्न उभा राहिला
धोतर नेसले तर हवेत उडते,
सैरभैर होते
घट्ट वस्त्र घातले
तर घुसमटते, जीव गुदमरतो

अशोक नायगावकर

Tuesday 25 June 2013

तु असतीस तर झाले असते


तु असतीस तर झाले असते
सखे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातुन
एक दिवाने नवथर गाणे


बकुळुच्या फुलापरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
आणि रंगानी केले असते
क्षितिजावर खिन्न रितेपण

पसरली असती छायांनी
चरणातली म्रूद्शामल मखमल
आणि शुक्रांनी केले असते
स्वागत अपुले हसुन मिश्किल

तु असतीस तर झाले असते
आहे त्याहुन हे जग सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन धरेतील धुसर अंतर

- मंगेश पाडगावकर

Friday 3 May 2013

शिवण


तशी आपली सगळी गाणी आपली समजत असतोच आपण
एखादेचसे गाणे त्यातले आतली शिवण उसवत जाते...
असले गाणे बऱ्याचदा रडता रडता ओठी येते
साधारणत असल्या वेळी आपले कोणी जवळ नसते...

आपले असे असतेच कोण ? एकदोन मिठ्या आणि चारदोन थेंब?
असले गाणे असल्या वेळी असलेच काही सांगत असते...

रस्त्यावरून वाहणाऱ्यांच्या नजरा जेवढ्या ओळखी देतात
पुतळ्यांच्या समोर किंवा काही जसे उभे असतात...
तसेच बघणे बघत बघत गर्दी होते आरपार
एकलेपणाच्या जाणिवेला आणखीन थोडी चढते धार...

तसे दुकटे असतेच कोण ? सगळेच असतात आपले आपले
'
आपले आपले' म्हटले तरी आपण कुठे असतो आपले?
असली ओळ एरवी कधी हातून लिहिली जात नाही
आपणसुद्धा गर्दीमध्ये सहसा मारवा गात नाही!
वेळेचीच ही गोष्ट आहे, असल्या वेळी वाटते लिहावे 
कवितांची आवड वेगळे....आणिक कविता करणे वेगळे!!

कवितादेखील असतेच कोण ? वाळूत मागे उरले पाय...
'
असे कधी चाललो होतो' - याच्याशिवाय उरतेच काय?

तरीसुद्धा कधीतरी शिवण उसवत जाते
एकदा शिवण चुकली म्हणजे आत काय न बाहेर काय!
एवढेच होण्यासाठी तरी असले गाणे मनात गावे
असले काही गुणगुणले की एकले काय नि दुकले काय...

-
संदीप खरे

Wednesday 27 March 2013

मरण…


अलभ्य फुलला सखे घनवसंत हा मोगरा 
विनम्र लपवू कुठे ह्र्दयस्पंदनाचा झरा

उन्हात मन शिंपिले पळसपेटला पारवा
कुडीत जळतो जसा मरणचंदणाचा दिवा

कुशीत जड अस्थिला नितळ पालवीची स्पृहा
भयाण मज वाटतो रुधिर अस्त गांधार हा

उदास भयस्वप्न की समिर येथला कोवळा
गळ्यात मग माझिया सहज घातला तू गळा

सुगंध दडवू कुठे गगन वैरिणीचे वरी
तुडुंब भरले तुवा कलश अमृताचे घरी

जळात जरी नागवी सलग इंद्रियांची दिठी
विभक्त जणु कुंतिला शरण कर्ण ये शेवटी

- ग्रेस

Saturday 9 March 2013

भुई भेगाळली खोल


भुई भेगाळली खोल, वल्लं र्‍हाईली न कुटं 
पाल्या-पाचोळयाचा जीव वहाटुईशी घुस्‍मटं

उभ्या दस्कटाचं रान आयुष्याला भिंगुळवानं
मुक्या जात्याच्या बाळूशी ओवी गाते जीवातून

सये सुगरनी बाई, तुला कशी सांगू गोष्ट
दाट दु:खाचं गाठुडं, शब्द उचलंना वटं

माय सुगरनी बाई, देई घरट्याशी थारा
असं बेवारशी जीनं सोसवेना उन्हं-वारा

-          - ना.धों.महानोर

Friday 8 March 2013

एकदा


एकदा पहिल्या पन्नासातच
पन्नास हजार विद्यार्थी आले
मग तपासाणारे म्हणाले
आता १०१ टक्के, १०२ टक्के, १०३ टक्के
असे मार्क देउ या !


नंतर नंतर व्हावचरं बनवणारे,
कॉरस्पॉन्डन्स करणारे लोक
शहरात राहू लागले
आणि कुळीथ, तूर, उडीद, बाजरी
पिकविणारे येडे खेड्यातच राहिले
खेड्यात गहू पिकतो
शहरात व्हावचरे पिकतात
कागदाचे भाव मात्र वाढतच राहीले
एके दिवशी मोठ्ठा  पाऊस आला
सगळे कागद ओले झाले
पण कागदांना मोड आले नाहीत

शेवटी गणोबाने परवा
रस्त्यात थांबवून दोन प्रश्न विचारले
१) परवा तुम्ही इतिहासात त्यांचे नाव
अजरामर होईल म्हणालात, त्यांचे नाव काय होते?
२) भारताला पारतंत्र्य किती साली मिळाले?


- अशोक नायगांवकर