Sunday 5 June 2011

याल्गार


नशीबास कर हवे तेवढे वार म्हणालो
मानणार ना तरी कधी मी हार म्हणालो

केला सौदा संकटांसवे आणि व्यथेला
खुशाल यावे उघडे आहे दार म्हणालो

खेळवून मज अखेर जेव्हा नियती दमली
डाव नवा मांडून तिला तैयार म्हणालो

रिचवून सारे तुडंब प्याले अपमानाचे
दगाबाज दु:खालाही आभार म्हणालो

कुबेर आला दारी म्हणाला माग हवे ते
हसून त्याला केवळ खांदे चार म्हणालो

रडलो नाही...लढलो, भिडलो आयुष्याला
राखेतुनही उठलो अन्‌ "याल्गार" म्हणालो

- गुरु ठाकूर

1 comment:

  1. काय बोलणार या कवितेबद्दल....
    शब्दच नाहीत म्हणालो.....
    जिद्द मनी पेटवून
    गुरु ठाकूर खूप छान खूपच छान म्हणालो

    ReplyDelete