Tuesday, 29 November 2011

तू कुठे आहेस गालिब

गालिब!
मला काहीतरी झालंय्...
समुद्र पाहून
काहीतरी व्हायचं माझ्या छातीत...
शहरातल्या गर्दीत उगाच फिरतानाही
दिशाहीन वाटायचं मला...
संध्याकाळी सैरभैर व्हायचं तळं मनाचं...
पण आता,
साधे तरंगही उठत नाहीत त्यावर.
ऋतू बदलताना उदास हलायचं माझ्यातलं झाड...
आता,
झाडावरल्या पक्ष्यांनाही कळत नाही झाडाचं हलणं...
रात्री बेरात्री ऊर उगाच भरून यायचा...
आता,
नीरव शांतता पांघरून
डोळ्यांच्या बाहुल्या टक्क जाग्या असतात,
अंधार पुसत राहतात,
इकडून तिकडे
तिकडून इकडे.
एवढंच काय गालिब!
कविता लिहून झाल्यावर
साधा कागद जरी पाहिला
की चक्क दिसायचं रे झुळझुळताना पाणी...
आता,
कोरड्या पात्रातून चालत पोहोचतो मी
समोरच्यापर्यंत.
एकमेकांची तहान पाहात कसं जगायचं असतं
हे एकदा तरी सांग गालिब!
आता मला तुझ्या वेदनांवर
माझ्या जखमांची मेणबत्ती पेटवू दे...
माझं बोट धरून
घेऊन चल मला कवितेच्या जंगलात पडणारा
पाऊस पाहायला...
तुझ्या गझलांची हरणं
माझ्या डोळ्यांतून मनापर्यंत
उधाण खेळायला सोड...
मधली कोरडी जमीन
शिंगांनी उकरून काढायला सांग त्यांना मात्र...
गालिब!
मला दु:खाइतकं मोठं व्हायचंय्...
भोवतालच्या अंधाराला वणवा नाही लागला तरी चालेल
माझ्या शब्दांचे दिवे तरंगताहेत त्यावर
एवढंच मला पाहायचंय...
माझ्या जिवावर पडत चाल्लेल्या
आत्महत्यांच्या गाठी पार करत करत...
मला मरेपर्यंत जगायचंय्...
तुझ्यासारखंच...!
मी तुला कधीचा शोधतो आहे
तू कुठे आहेस गालिब?

नव्या शरीरातून
तू कदाचित ऐकतही असशील तुझंच गाणं...
तुझ्याच दु:खाची
तुला कदाचित ओळख नसेल राहिली...
"
खुदा ऐसे एहसास का नाम है
रहे सामने और दिखाई ना दे...'
तसा
तू मला भेटतही असशील रोज...
कदाचित,
मी बारमध्ये दारू पिताना
प्रत्येक वेळी माझ्यासमोर झिंगून बसलेला
तूच असशील कदाचित...
कदाचित तू स्वत:
दारू होऊन रोज पोटात जात असशील माझ्या...

गालिब!
कुणीतरी तुझा शेर ऐकवला
आणि माझ्या तोडून "व्वा' निघालीच नाही...
मी इतका कोरडा होण्याआधी भेट...
अन् भेटल्यावर
नेहमीप्रमाणे माझ्याकडे उधार माग...
मी तुला काहीच देऊ शकणार नाही
म्हणजे मी किती कोरडा झालोय्
याची तुला कल्पना येईल...
आता
तू माझा आधार व्हायचंस
मी तुझा नाही...
आणखी कितीतरी शतकं पुरेल
एवढा झंझावात तू ठेवून गेलायस या जगात...
त्यातली फक्त एक झुळूक पुरेल मला
हे संपूर्ण आयुष्य जगायला...

मी तुला कधीचा शोधतोय्
तू कुठे आहेस गालिब?

 
- सौमित्र

Wednesday, 23 November 2011

जानवी

सांगा कुणीतरी या आकाशखाजव्यांना-
मातीच मोक्श देई कंगाल नागव्यांना!”

आहे जरी उभा मी निष्पर्ण माळरानी
या स्वप्नपाखरांच्या रोखू कसा थव्यांना?

आली नव्या जगाची आली पहाट आली
आता उन्हात आणू पाळीव काजव्यांना!

येती जरी समोरी सारे नकोनकोसे
मीही नकोनकोसा झालो हव्याहव्यांना

साधाच मी भिकारी, माझी रितीच झोळी
गावात मान त्यांच्या श्रीमंत जोगव्यांना!

प्रत्येक आतड्याचा मी पीळ होत आहे
ते मात्र गाठ देती त्यांच्याच जानव्यांना!

- सुरेश भट

Saturday, 19 November 2011

एवढे तरी करून जा

एवढे तरी करून जा
हा वसंत आवरून जा

ही रीत मोहरायची
आसवांत मोहरून जा

तारकांपल्याड जायचे
ह्या नभास विस्मरून जा

ये उचंबळुन अंतरी
सावकाश ओसरून जा

ह्या हवेत चंद्रगारवा ..
तू पहाट पांघरून जा

ये सख्या, उदास मी उभी
आसमंत मंतरून जा

सुरेश भट

Friday, 18 November 2011

उपकार

एक जन्म पुरतोय ईश्वरा नको तुझे उपकार पुन्हा
खूप तुझे कर्तॄत्व पाहिले नको नवे अवतार पुन्हा

खोल तुझ्या बाणाचा पल्ला माझ्या हळव्या हॄदयाशी
सावज असुनी सुसखाअन्त होता कोसळतो प्रतिकार पुन्हा

एके काळी होतो राजा शब्दगणांच्या राज्याचा
कंगालांचा भरतो आहे आजकाल दरबार पुन्हा

सूडाने मी विरोधातल्या पक्षाला मतदान दिले
हातोहात कसे दसावरले निलाजरे सरकार पुन्हा

दासबोध वाचून उघडले घर मी सगळ्यांच्यासाठी
आता रचतो आहे माझे रस्त्यावर घरदार पुन्हा

गहाणही सर्वस्व ठेवले सुखशांतीच्या पेढीवर
जमले तर आल्या बाजारी स्वतःसही विकणार पुन्हा

देवदूत अन अतिरेक्यांच्या मधुचंद्राची गोची का
मध्यस्थी माणूस मरावा , सावरेल संसार पुन्हा

- सुरेश भट